–अशोक उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Birthday Greetings to Showman Subhash Ghai, One of the Most Successful Producer Director of Hindi cinema. चित्रपट दिग्दर्शक मालिकेतील अलीकडच्या काळातील शेवटचा मालुसरा म्हणुन सुभाष घई यांचा उल्लेख करावा लागेल. या मालिकेत अनेक नावे घेता येतील परंतु नायक निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक म्हणून सुभाष घई यांनी येथे आपली कारकिर्द केली व आजही कार्यरत आहेत. सुभाष घई यांचा जन्म 24 जानेवारी 1945 रोजी आज महाराष्ट्रात असलेल्या परंतु स्वातंत्र्या पुर्वी सीपी बीरार प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतातील नागपूर येथे झाला. चित्रपट सृष्टीकरीता त्यांची कारकिर्द 1970 च्या दरम्यान सुरु झाली. ‘तकदीर’ या चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम काम केले. सुभाष घई यांचे शालेय शिक्षण दिल्ली येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी रोहटक मध्ये पूर्ण केले. पुणे येथील एफ.टी.आय. मध्ये त्यांनी प्रवेश घेतला व अभिनय, दिग्दर्शन, संकलन हे अभ्यासक्रम पूर्ण केले. ‘तकदीर’ हा राजश्रीचा चित्रपट होता.
सुभाष घई यांच्या अभिनयाची व एका गीताची आठवण घ्यायची झाली तर 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘उमंग’ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागले. अर्चना, सतीश यांच्या शंकर-जयकिशन यांनी संगीत बद्ध केलेल्या या चित्रपटातील एक विवाहगीत महंमद रफी यांनी गायले होते व सुभाष घई यांच्यावर चित्रीत झाले होते. गीताचे बोल होते. ‘बाबुल कौन घडी मे आयी, कल तक थी जो लाडली बेटी, हो गई आज परायी. आत्माराम यांचा निर्माता, दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट होता. ‘आराधना’ या राजेश खन्ना यांच्या चित्रपटाचे त्यांचे दर्शन झाले होते तर रीना रॉय, डॅनी सोबत आपण त्या नंतर ‘गुमराह’ मध्ये पाहिले होते. नायक म्हणून किंवा सहाय्यक नायक म्हणून आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपला मार्ग निवडला. पुणे येथील एफ.टी.आय. या संस्थेत घेतलेल्या ज्ञानाचा त्यांना उपयोग झाला. शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘शिफारस पत्रामुळे सुभाष घई यांना ‘कालिचरण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. ‘कालिचरण’ चे निर्माते एन.एन. सिप्पी होते. शत्रुघ्न सिन्हा यांचा टायटल रोल होता. पहिल्याच चित्रपटात घवघवीत यश मिळाले.
त्यानंतर याच शत्रुघ्न सिन्हाचा 1978 साली ‘विश्वनाथ’ दाखल झाला. ‘विश्वनाथ’ हा चित्रपट आज देखील लक्षात राहतो तो संवादामुळे. शत्रुघ्न सिन्हाचा या चित्रपटाचा गाजलेला संवाद म्हणजे, “जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, जिस राख से बारूद निकले उसे विश्वनाथ कहते है” हा डायलॉग गाजला. ‘विश्वनाथ’ या चित्रपटास रौप्यमहोत्सवी यश मिळाले. शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय ही जोडी हीट ठरली. त्यानंतरच्या ‘गौतम गोविंदा’ ला मर्यादीत यश मिळाले. पुर्नजन्मावर आधारीत गुढ संगीतमय कथा म्हणून ‘कर्ज’ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. ऋषी कपुर, टीना मुनीम, सिम्मी गरेवाल, राजकिरण, प्राण यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपटाची गाणी गाजली. धर्मेन्द्र, शशी कपूर यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या ‘क्रोधी’ या चित्रपटास म्हणावे तसे यश मिळाले नाही तर अभिनय सम्राट दिलीप कुमार यांना दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना निर्माता गुलशन रॉय यांनी ‘विधाता’ मध्ये करून दिली. इतर नामवंत बॅनर खाली काम करीत असतांना सुभाष घई यांनी ‘मुक्ता आर्टस’ या बॅनरची स्थापना केली. ‘मुक्ता’ हे त्यांच्या पत्नीचे नाव. या बॅनरखाली नायक म्हणून त्यांनी जॅकी श्रॉफ यास ‘हिरो’ मध्ये संधी दिली. मुक्ता आर्टस या बॅनर खाली प्रदर्शीत झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटास सुवर्ण महोत्सवी यश मिळालं. या चित्रपटाची नायिका मिनाक्षी शेषाद्री होती. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली सर्वच गाणी गाजली. निर्माता एन.एन. सिप्पी यांनी त्यांना ‘मेरी जंग’ या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून संधी दिली.
अनिल कपुरची ‘अँग्री यंग मॅन’ ही भुमिका ‘मेरी जंग’ या चित्रपटाचे खास आकर्षण होते. ‘मेरी जंग’ मधील वकील म्हणून अमरीश पुरी, अनिल कपूर आमने सामने आले हेोते. टकराल उर्फ अमरीश पुरी या चित्रपटाच्या एका दृष्यात म्हणतो, ‘मैने पचहत्तर लोगो को फांसी के फंदे पर चढाया है, तर अनिल कपूर त्यास उत्तर देतो, ‘पचहत्तर लाशेोंपर खडा हुआ ये टकराल बडाही ‘खुदगर्ज’ इन्सान है’. ‘विधाता’ नंतर आपल्याच बॅनरखाली दिलीपकुमार, नुतन यांना घेऊन त्यांनी ‘कर्मा’ची निर्मिती केली. देशाकरिता आपल्या परिवाराचे बलीदान देणाऱ्या कुटुंबप्रमुख पोलिस अधिकाऱ्याची कथा ‘कर्मा’मध्ये पहायला मिळाली. अनुपम खेर ‘कर्मा’चा खलनायक होता. मायकेल डॅन्ग ही त्याची भुमिका गाजली. जॅकी श्रॉफ, नसिरोद्दीन शहा, अनिल कपूर, श्रीदेवी, पुनम ढिल्लाँ यांच्या प्रमुख भुमिका होत्या. गाणी गाजली. त्यानंतर आलेल्या ‘राम-लखन’ या चित्रपटाने अनिल कपूर यास नायक म्हणून स्थान मिळवून देण्यास मदत केली. ‘राम-लखन’ गाजविला तो अनिल कपूर, माधुरी आणि जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडीया यांनी.
‘पैगाम’नंतर समोरा-समोर येण्यास तयार नसलेल्या दिलीपकुमार, राजकुमार यांना ‘सौदागर’मध्ये समोरा-समोर आणण्यात सुभाष घई यशस्वी झाले. ‘खलनायक’ हा संजय दत्तचा चित्रपट. त्याच वेळी त्याच्यावर 1992-93 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी म्हणून शिक्कामोर्तब झाले होते. आपल्याच चित्रपटातील ‘नायक नही खलनायक हुँ मै’ हे गाणे प्रत्यक्ष जीवनात म्हणण्याची वेळ संजय दत्तवर आली होती. आपल्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘त्रिमुर्ती’चे दिग्दर्शन त्यांनी मुकुल आंनद यांना दिले. ‘परदेस’ या चित्रपटास कर मुक्तीचा फायदा मिळाला. तर ‘ताल’ म्युझिकल हीट ठरला. ‘ताल’ मध्ये अक्षय खन्ना, ऐश्वर्या रॉय, अनिल कपूर यांच्या प्रमुख भुमिका होत्या. त्यानंतर आलेला ‘यादे’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी झाला नाही. तशीच अवस्था विवेक ओबेरॉय अभिनीत ‘किस्ना-दि वॉरीयर पोयट’ या चित्रपटाची झाली. ‘इकबाल’ द्वारा नागेश ककनुर हा दिग्दर्शक देण्यात ते यशस्वी झाले. ‘युवराज’ या चित्रपटास देखील अपेक्षीत यश मिळाले नाही.
मुक्ता आर्टस बॅनरखाली तयार झालेल्या ‘परदेस’ या चित्रपटास उत्कृष्ट पटकथेचे तर ‘सौदागर’ करिता उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार सुभाष घई यांना मिळाला. त्यांच्या ‘इकबाल’ या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपट क्षेत्रात मार्गदर्शन करण्याकरिता त्यांनी ‘व्हिसलिंग वुडस’ या संस्थेची स्थापना केली. सुभाष घई यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खिडकीवर यशस्वी ठरले परंतु काही चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. निर्माता-दिग्दर्शक, पटकथा, लेखक म्हणून सुभाष घई यांची कारकिर्द उल्लेखनीय ठरली आहे. जॅकी श्रॉफ, अनिल कपूर यांची रूपेरी कारकिर्द घडविण्यात सुभाष घई यांचा सिहांचा वाटा आहे. मुक्ता आर्टस या बॅनरखाली त्यांची चित्र निर्मिती चालु आहे. नजिकच्या काळात केवळ निर्माता म्हणून गाजलेले त्यांचे काही चित्रपट ‘ऐतराज’ (2004), ‘36 चायना टाऊन’ (2006), ‘अपना सपना मनी मनी’ (2006), ‘गुड बॉय बॅड बॉय’ (2007) हे होत. सन 2008 राजू फारुकी व राहुल पुरी यांच्यासोबत सहनिर्माता व दिग्दर्शक म्हणून ‘ब्लॅक अँड व्हाईट’ हा अनिल कपुर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट मर्यादित यश मिळवून गेला.
24 एप्रिल 2014 रोजी बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांची निर्मिती व दिग्दर्शन लाभलेला ‘कांची – द अनब्रेकेबल’ हा चित्रपट नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन दाखल झाला. आपल्या निर्मितीच्या चित्रपटात आपली छबी काही क्षणाकरिता दाखवणे, हा त्यांचा छंद होय.
सुभाष घई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
(२०१४ साली “लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन” या अशोक उजळंबकर (संस्थापक, संपादक- नवरंग रुपेरी) लिखीत व सुभाष घई यांच्या हस्ते प्रकाशित पुस्तकातील सुभाष घई यांच्यावरील लेखाचा संपादित अंश)
हिंदी सिनेमाच्या ७० ते ८० च्या दशकावर आधारित इतर लेखांसाठी क्लिक करा
***