– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
PS-2 Movie Review
कथानक थोडक्यात – १० व्या शतकात दक्षिण भारतावर वर्चस्व असलेले सम्राट सुंदर चोल (प्रकाश राज) आणि त्यांचे दोन राजपुत्र आदित्य करिकालन (विक्रम) आणि अरुणमोली वर्मन (जयम रवी) यांच्या तंजोर स्थित साम्राज्यावर अंतर्गत विद्रोहाचा धोका निर्माण झालेला असतो. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या अंती दाखविल्यानुसार अरुणमोली ला संपविण्याचा चोल साम्राज्यांच्या शत्रूंचा म्हणजेच पांड्यांचा प्रयत्न असतो परंतु यातून अरुणमोली वाचतो. तंजोर येथील विद्रोहाच्या आगीत तेल ओतण्याचे काम आदित्य ची पूर्वायुष्यातील प्रेयसी नंदिनी (ऐश्वर्या राय बच्चन) पांड्या सैनिकांच्या मदतीने करीत असते. पहिला प्रयत्न फसल्यावर मग सुंदर चोल, आदित्य आणि अरुणमोली यांना एकाच रात्री संपविण्याचे षडयंत्र रचले जाते. या षडयंत्रा बद्दल समजल्यावर आदित्य आणि अरुणमोली यांची बहीण कुंदवई (त्रिशा) आणि याच दोघांचा विश्वासू मित्र वल्लवरायण वंदियादेवन (कार्ती) हे दोघे आदित्यला याबद्दल सावध करतात. नंदिनी आदित्यला कदंबुर येथे बोलावते. तिच्या योजनेची माहिती असूनही आदित्य तिथे जातो. तिथे काय होते? आदित्य सोबतच त्याच रात्री ज्यांना संपविण्याची योजना असते असे सम्राट सुंदर चोल आणि अरुणमोली त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून कसे वाचतात? नंदिनी च्या बदल्यामागे नेमके काय कारण असते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत कथानक पुढे सरकते ज्याचा शेवट अरुणमोली हा महान राजा राजा चोल-१ अर्थात पोन्नीयन सेल्वन कसा बनतो या ठिकाणी येऊन होतो.
काय विशेष?- पहिल्या भागात पात्रांची अवघड नावे, पात्रांमधील नाते, कथानक सांगण्याची किचकट पद्धत यामुळे दक्षिण भारत वगळता बहुतांश हिंदी बेल्ट मधील प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यास ‘पीएस-१’ कमी पडला ज्याचा परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शन वर सुद्धा दिसला. दक्षिणेत चित्रपटाला दैदिप्यमान यश मिळाले पण हिंदीत ते रिपीट होऊ शकले नाही. पण दुसरा भाग म्हणजे ‘पीएस-२’ मात्र वरील सर्व अडचणींवर मात करतांना दिसतो. चित्रपटाच्या सुरुवातीला दिग्दर्शक मणिरत्नम यांनी कथानकाचा पुनश्च सोप्या भाषेत आढावा घेतला आहे आणि दुसऱ्या भागात कथानकाची नॅरेशन स्टाईल सुद्धा एकदम सरळ सोप्पी आहे. याचा परिणाम आणि सोबतीला वेगवान आणि दमदार पटकथा (मणिरत्नम, बी जयमोहन आणि एलांगो कुमारवेल) असल्याने ‘पीएस-२’ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चांगलाच बांधून ठेवतो. त्यात भर म्हणून आहे मणिरत्नम यांचे क्लास दिग्दर्शन. अर्थात मणी सर म्हटल्यावर हे अपेक्षित आहेच म्हणा. यानंतर तुम्हाला खिळवून ठेवण्यात मदत करते ते म्हणजे सुंदर छायांकन. सिनेमाटोग्राफर रवी वर्मन यांची एक ना एक फ्रेम कमालीची सुंदर आणि नेत्रदीपक आहे. पटकथेतील घटनाक्रमात कुठेही गाण्यांना स्थान नसल्याने पहिल्या भागापेक्षा या भागात संगीतकार ए आर रेहमान यांना तसे फारसे काम नाही परंतु त्यांनी दिलेले पार्श्वसंगीत मात्र खूपच परिणामकारक असे झाले आहे. बी जयमोहन यांचे भारी संवाद , श्रीकर प्रसाद यांचे संकलन, केचा खंफाकडी , शाम कौशल आणि दिलीप सुब्बारायन या त्रिकुटाने दिग्दर्शित केलेले अफलातून ऍक्शन सीन्स, एका लखानी यांचे चोल साम्राज्याच्या काळाला आणि पार्श्वभूमीला अनुसरून केलेले सुंदर कॉस्च्युम डिझायनिंग या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू आहेत. अभिनयाच्या बाबतीत सर्वांनीच आपापली पात्रे अतिशय प्रामाणिक रित्या सादर केली आहेत यात वाद नाही. परंतु त्यातल्या त्यात कार्ती आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि विक्रम यांचा अभिनय लाजवाब झाला आहे.
नावीन्य काय?- चोल साम्राज्यावर आधारित लार्जर दॅन लाईफ कथानक सांगणारा हा पहिलाच सिनेमॅटिक प्रयत्न असल्याने दोन्ही भाग कथानकाच्या बाबतीत नावीन्याने परिपूर्ण आहेत.
कुठे कमी पडतो? – पटकथेची डिमांड नव्हती तरी एखाद दोन सुपरहिट गीते दिग्दर्शकाला घेता आली असती. स्पेशल इफेक्टस आणि निर्मिती मूल्ये याबाबतीत ‘बाहुबली’ सारख्या चित्रपटांशी तुलना केल्यास ‘पीएस’ चे दोन्ही भाग कमी पडतात. मणी सरांचा सिनेमा असल्याने तुलनेने मसाला ट्रीटमेंट सुद्धा कमी आहे.
पहावा का?- अर्थातच. जरूर पाहावा आणि हो सिनेमागृहात पाहिल्यास अतिउत्तम.
स्टार रेटींग – 3.5/5
इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा