-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

आज सुप्रसिद्ध गीतकार शकील बदायुनी (Lyricist Shakeel Badayuni) यांचा जन्मदिन. पूर्वी गीतकार आणि संगीतकार यांच परस्परांच एक ट्यूनिंग असायचं. परस्परांच्या कौशल्याचा अंदाज आल्याने कुणाला नेमकं कधी काय हवंआहे हे चटकन समजत असे. त्यामुळेच आपल्याकडे गीतकार आणि संगीतकारांच्या अनेक जोड्या लोकप्रिय ठरल्या. यातच एक जोडी होती संगीतकार नौशाद अली आणि गीतकार शकील बदायुनी यांची. या दोघांच नातं मैत्रीहून अधिक होतं. (story of special bonding between Lyricist Shakeel Badayuni and music director naushad)
कारदारच्या ’दर्द’ पासून यांची एकत्र कामाची सुरूवात झाली. १९५१ च्या ’बाबुल’ (याचे निर्माते स्वत: नौशाद होते) पासून नौशाद अलींनी किरकोळ अपवाद वगळता पुढची २० वर्षे केवळ शकीलच्या गीतांना स्वरबध्द केले! या दोघांच्या युतीची अप्रतिम कलाकृती म्हणजे ’बैजू बावरा’, ’मदर इंडीया’, ’मुगल-ए-आजम’, ’मेरे मेहबूब’, ’सन ऑफ इंडीया’, ’ कोहिनूर’. पन्नास आणि साठच्या दशकातील संगीताच्या सुवर्णकाळातील यांच्या गाण्यांनी रसिकांच्या काळजात अजूनही घर केले आहे.
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात गीतकार शकील यांना क्षयरोगाची लागण झाली. वयाच्या पन्नासाव्या वर्षीच अशा दुर्धर व्याधीने गाठल्याने त्यांच सारं कुटुंब हादरले. पैसा पाण्यासारखा खर्च होवू लागला. शेवटी त्यांना पांचगणीला ठेवण्यात आले. नौशाद यांना आपल्या मित्राची अशी अवस्था कळल्यावर ते अती दु:खी झाले. शकील आर्थिक विवंचनेत असले तरी ते स्वाभिमानी आहेत ते कुणाकडूनही काहीही मदत घेणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. मित्राची परिस्थिती त्यांना कळत होती पण त्याला मदत कशी करावी याचा विचार त्यांना चैन पडू देत नव्हता. त्या काळात त्यांच्याकडे तीन सिनेमाचे निर्माते संगीतासाठी अॅप्रोच झाले होते. नौशाद अलींनी त्या निर्मात्यांना शकीलच्या आजाराबाबत सांगितले व त्याला या अवस्थेत जास्तीत जास्त मदत करणं किती महत्वाचं आहे हे पटवून दिले. शकीलला गीत लेखनात व्यग्र ठेवलं तर आजाराकडे त्याचं आपोआपच दुर्लक्ष होईल हे ही सांगितलं तसेच या निर्मात्यांना शकीलला जास्त पैसे देण्याचे आवाहन केले. हे तीन सिनेमे होते ’आदमी’, ’संघर्ष’ आणि’राम और शाम’. नौशाद शकीलला भेटायला पाचगणीला जायचे. मित्राची ती अवस्था त्यांना बघवत नव्हती. नौशाद अलींनी शकीलला गीतलेखनाबाबत सांगितले. शकील ला सर्व परीस्थिती समजली होती. मित्राच्या भावना त्याला समजत होत्या. त्याही अवस्थेत त्याने गाणी लिहिली. पण आजार बळावत गेला. पैलतीर आता स्पष्ट दिसू लागला. नौशादचे हर तर्हेने त्याला वाचवायचे, खूष ठेवायचे प्रयत्न चालू होते. शकील भरल्या डोळ्याने सर्व काही पाहत होता. सारा जीवनपट डोळ्यापुढे तरळत होता. रात्र बरीच उलटून गेली होती. त्याने कागद काढले पेन उचलले. आणि लिहायला सुरूवार केली  ’आज की रात मेरे दिल की सलामी लेजा, दिलकी सलामी लेजा कल तेरी बज्म से दिवाना चला जायेगा शम्मा रह जायेगी परवाना चला जाएगा…’

पुढे काही दिवसातच शकील दुनियेला अलविदा म्हणत निघून गेला. आपल्या गीतातून रसिकांच्या भावनांना अतिशय अप्रतिम पणे गुंफणार्या या गीतकारच्या अखेरच्या गाण्याची हि भावस्पर्शी आठवण! 

हेही वाचा – सुहाने गीतों का सफर ..शकील बदायूनी

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment