– धनंजय कुलकर्णी 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Renowned Singer Mahendra Kapoor on his birth anniversary and the story of first song. आज ९ जानेवारी …गायक महेंद्र कपूर यांचा जन्म दिवस! त्यांच्या पहिल्या गाण्याची जन्मकथा ..

नवीन पार्श्वगायकाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण भारतात १९५७ साली ’ मेट्रो – मरफी ऑल इंडीया सिंगींग कॉंपिटीशन ’ हि स्पर्धा घेण्यात आली.यात महेंद्र कपूर या स्पर्धेचा विजेता होता तर गायिंकामध्ये आरती मुखर्जी यांनी बाजी मारली. महेंद्र कपूरच्या छोटेखानी घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं. देशभरातून पहिला नंबर मिळाल्याने महेंद्रकपूर तर ’सातवे आसमान’वर होता. पण या आनंदावर विरजण पडलं ; कोर्टाकडून आलेल्या एका समन्स मुळे. घरातील आनंदाचं वातावरण क्षणार्धात पालटलं. याच स्पर्धेतील एकाने महेंद्रच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्याच्या मते हि स्पर्धा नवोदित हौशी गायकांकरीता होती. पण महेंद्रने स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी एका सिनेमात गाणे गायले होते त्यामुळे त्याची निवड अवैध आहे. प्रकरण कोर्टात गेले. स्पर्धेचे आयोजक मरफी रेडीओ यांना पार्टी करण्यात आले. संयोजकांनी महेंद्र कपूरच्या विरोधात फसवणूकीचा दावा लावला व संपूर्ण स्पर्धेचा खर्च त्याच्याकडून वसूल करण्यासाठी समन्स धाडले! घरात चिंतेचे वातावरण होते. एवढे पैसे आणायचे कुठून? त्याने स्पर्धेपूर्वी एका सिनेमात गायन केले हे जरी खरे असले तरी त्या गाण्याकरीता त्याने एक पैसाही मानधन घेतले नव्हते. याच मुद्द्यावर महेंद्रने आपली बाजू कोर्टापुढे मांडली. सच्चेपणाची, प्रामाणिकपणाची एक उपजत ताकत असते. न्यायमूर्ती व्ही डी तुळजापूरकर यांना पटला आणि महेंद्र कपूर न्यायालयीन लढाई जिंकला व स्पर्धेतील विजेतेपद देखील अबाधित राखण्यात यशस्वी ठरला. या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून लाभले होते जेष्ठ संगीतकार अनिल विश्वास, नौशाद, सी रामचंद्र, वसंत देसाई, एन दत्ता आणि मदन मोहन. विजेत्या स्पर्धकाला या संगीतकारांकडून एकेक गाणं गायला मिळणार होतं.

सी रामचंद्र तथा अण्णांनी महेंद्रला पहिला ब्रेक ’नवरंग’ (१९५९) च्या वेळी दिला. या गाण्याच्या वेळचा एक किस्सा महेंद्र कपूरचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. पहिलंच गाणं युगल गीत होतं. आशा भोसले सोबत ’आधा है चंद्रमा रात आधी’. पहिलंच गाणं ते देखील आशा सोबत त्या मुळे महेंद्र कपूरवर थोडं दडपण आल्याने तो नर्व्हस होता. गाण्याचं ध्वनीमुद्रण चालू झालं. गाणं मध्यावर आलं. अण्णा कानाला हेडफोन लावून गाणं ऐकत होते. त्यांना काही तरी चुकतय असं वाटू लागलं. ते धावतच सिंगींग बूथ मध्ये गेले. ’रूको रूको’ म्हणत त्यांनी रेकॉर्डींग थांबवलं. कुणालाच काही कळेना. महेंद्र तर बिचारा घाबरून गेला. ’अण्णा कुछ गलती हो गयी क्या?’ असं त्याने विचारले. तितक्यात राजकमल चे सॉंग रेकॉर्डीस्ट मंगेश देसाई तिथे पोचले. ते अण्णांना म्हणाले ’बच्चा तो काफी अच्छा गा रहा है..’ आता थक्क व्हायची पाळी अण्णांची होती कारण त्यांना महेंद्रचा आवाजच ऐकू येत नव्हता. त्यांच्या हेडफोनला जोडलेल्या वायर मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता. ताबडतोब ती वायर बदलण्यात आली व गाणं पुन्हा एकवार सुरू झालं. आणि महेंद्रचा जीव भांड्यात पडला. त्याचं पहिलचं गाणं सुपर हिट झालं!

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment