©विवेक पुणतांबेकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Remembering Music Director Jaidev. ‘एक अकेला इस शहरमे…’ घरोंदा चे गाणे आठवले की डोळ्यासमोर उभे रहातात अलिकडेच दिवंगत झालेले भुप्रेंद्र आणि या गाण्याला स्वरबध्द केलेले उपेक्षित गुणी संगीतकार जयदेव वर्मा. जणू काही आपली व्यथाच या गाण्याला स्वरबध्द करुन त्यांनी सांगितली. सिनेमाला वाचा फुटल्यापासून आत्तापर्यंत सुमारे १२५ पेक्षा जास्त संगीतकारांनी हिंदी सिनेसंगीत समृध्द केले. यातले काही व्यावसायिक यश न लाभूनही रसिकांच्या मनात कायम राहीले. त्यातलेच एक जयदेव जी.

नैरोबी येथे ३/८/१९१९ ला जयदेव यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल अफ्रिकन रेल्वेत नोकरीला होते. नंतर हे कुटुंब लुधियानाला रहायला आले. वडिलांची दृष्टी अधू झाली. साहजिकच कुटुंबाचा सगळा भार जयदेव जीं वर पडला. नोकरी करणे भागच होते. वडिलांच्या मृत्यु नंतर त्यांनी शास्रीय संगीत शिकायला सुरुवात केली त्याच वेळी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी. करु लागले. जोधपूर च्या राजदरबारी सरोद वादक अली अकबर खान नोकरीला होते. विमान अपघातात जोधपूर चे महाराज निधन पावले. अली अकबर खान यांनी मुंबईला जायचे ठरवले. जाताना आपल्या शिष्याला जयदेवजींना पण ते घेऊन आले. अली अकबर खानांबरोबर जयदेव जी पण सिने विश्वात चकरा मारु लागले. सुरुवातीला ४—५ पौराणिक सिनेमात काम केल्यावर त्यांना जाणवले की अभिनय हे आपले क्षेत्र नव्हे.

चेतन आनंद यांनी नवकेतन या आपल्या फिल्म कंपनी ची स्थापना केली होती. आपल्या सिनेमाला उस्ताद अली अकबर खान यांनी संगीत द्यावे म्हणून चेतन आनंद त्यांना भेटले. नवकेतन च्या आंधीया (१९५२) आणि हमसफर (१९५३) या देवानंद यांची प्रमुख भुमिका असलेल्या सिनेमांना अली अकबर खान यांनी संगीत दिले. पण हे दोन्ही सिनेमे अपयशी झाले. अली अकबर खान यांनी मुंबई सोडली. पण जयदेव यांनी मुंबईतच रहायचा निर्णय घेतला आणि संगीतकार एस.डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणून काम करु लागले. नवकेतन च्या यशात बर्मनदांचा फार मोठा वाटा आहे. टॅक्सी ड्रायवर (१९५४), मुनीमजी, हाऊस नंबर ४४ (१९५५), चलती का नाम गाडी (१९५८), सुजाता आणि इन्सान जाग उठा (१९५९) या सिनेमात जयदेव यांनी बर्मनदांचे सहाय्यक म्हणून काम केले.

जयदेव ना संगीतकार म्हणून पहिला सिनेमा मिळाला चेतन आनंद यांचा जोरु का भाई  (१९५५) याचे नायक होते बलराज सहानी. हा सिनेमा फारसा धंदा करु शकला नाही पण जयदेव ना आपले कौशल्य दाखवायला मिळाले. या नंतर समुद्री डाकू आणि चेतन आनंद यांच्या अंजली  (१९५७) या सिनेमांना जयदेव यांनी संगीत दिले. या सिनेमांना माफक यश मिळाले. पण जयदेव यांची प्रतिभा खुलली १९६१ च्या हम दोनो सिनेमात. यानंतर सुनिल दत्त यांच्या मुझे जीने दो सिनेमात जयदेव यांचे मधुर संगीत गाजले. मान्यवर संगीतकारांच्यात आता जयदेव जीं चा समावेश झाला. हम दोनो मधली सगळी गाणी आजही रसिकांना मोहून टाकतात. हम दोनो हा नवकेतन प्राॅडक्शन्स साठी संगीत दिलेला जयदेव जी यांचा अखेरचा सिनेमा होता. गाईड सिनेमाचे संगीत जयदेव नी करायचे असे आधी ठरले होते. एक गाणे पण रेकाॅर्ड झाले होते.पण नंतर तो सिनेमा बर्मनदांना दिला गेला. कदाचित जयदेव जीं चे संगीत गाईड ला लाभले असते तर हा सिमेमा आणखी वेगळ्या उंचीवर गेला असता.

१९७१ साली सुनिल दत्त यांच्या रेश्मा और शेरा सिनेमाला जयदेव यांनी संगीत दिले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी हा सिनेमा पाठवला गेला होता. यातल्या जयदेव जींनी संगीतबध्द केलेल्या लतादिदी यांनी गायलेल्या तू चंदा मै चांदनी गाण्यासाठी जयदेव ना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण रेश्मा और शेरा हा सिनेमा अपयशी झाला. त्याच वर्षी निर्माते दिग्दर्शक के.ए. अब्बास यांच्या दो बूंद पानी या कलात्मक सिनेमाला जयदेव नी संगीत दिले. पण दुर्देव असे की या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत तर फक्त मराठा मंदिर थिएटरमध्ये मॅटीनी शो ला हा सिनेमा प्रदर्शित केला होता. या नंतर १९७४ साली फासला या सिनेमाला जयदेव नी संगीत दिले. १९७७ ते १९७९ हा काळ जयदेवजींचा सर्वोकृष्ट काळ होता. सुरेख संगीतरचना त्यांनी केल्या.

आलाप (१९७७), घरोंदा (१९७७), तुम्हारे लिये (१९७८) आणि दूरीयां (१९७९) असे सिनेमे त्यांना संगीतबध्द करायला मिळाले. मुझफ्फर अली यांच्या गमन (१९७८) सिनेमाला दिलेल्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जयदेव यांचा शेवटचा सिनेमा त्रिकोन का चौथा कोन १९८६ साली आला. त्यांनी स्वरबध्द केलेल्या २५० रचना रसिकांना मोहवून गेल्या. किनारे किनारे, आषाढ का एक दिन, आझादी पचीस बरस की, प्रेम पर्बत, आलिंगन, परिणय, एक हंस का जोडा, फासला, आंदोलन, आलाप, तुम्हारे लिए, दूरीयां, आतिष, सोलवा सावन, आज तेरी याद, एक गुनाह और सही, वो ही बात, अनकही आणि अमरज्योती असे त्यांनी संगीत दिलेले सिनेमे फारसे चालले नाही. यातल्या सगळ्या रचना अप्रतिम होत्या. जयदेव ना गीतलेखकांचे संगीतकार म्हणत. अनेक गैरफिल्मी रचना पण त्यांनी अतिशय अप्रतिमपणे संगीतबध्द केल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेले संगीत. या संग्रहातल्या सगळ्या रचना मन्ना डे यांनी गायल्या होत्या.

लतादिदी आणि आशाताई या दोघीं बरोबर काम करताना जयदेवजी अधिक उत्साहात रचना करत. अनेक मान्यवर कविंच्या रचनांना तसेच गझलांना त्यांनी चाली लावल्या आणि पिनाज मसानी, चंदन दास, आणि हरिहर यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या आवाजात रेकाॅर्ड केल्या. दूरदर्शन च्या रामायण मालिकेसाठी त्यांनी संगीत दिले. हे त्यांचे शेवटचे योगदान. जरी त्यांचे बहुतेक सारे सिनेमे अपयशी झाले तरी त्यांचे संगीत गाजले. ह्रषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी, मुज्जफर अली या सारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या सिनेमांना संगीत देऊनही जयदेव ना फारसा लाभ झाला नाही. अमोल पालेकर यांच्या अनकही मधल्या भीमसेन जोशी यांनी गायलेल्या भजनांसाठी जयदेव यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळा सूरसिंगार संसद पुरस्कार लाभलेले जयदेव हे एकमात्र संगीतकार. मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार पण जयदेव ना मिळाला.

हम दोनो आणि मुझे जीने दो चा अपवाद वगळल्यास त्यांना व्यावसायिक यश लाभले नाही. पण त्याची पर्वा न करता सातत्याने चांगले संगीत देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षा आली. सहाय्यक संगीतकार म्हणून काम करताना त्यांच्या रचना आपल्या नावावर खपविण्याचा धंदा अनेकांनी केला. बर्मनदा आणि त्यांच्या मैत्रीत अनेकांनी वितुष्ट आणले.

आपल्या बहिणीचा संसार मांडून देणारे जयदेव अविवाहीत राहीले. स्वतःचे घर पण न घेता शेवटपर्यंत मुंबईच्या एका इमारतीत जिन्याखालच्या खोलीत पेईंग गेष्ट म्हणून राहिले. त्यांच्या रचनांमधून एक प्रकारचे औदासिन्य जाणवते.

वयाच्या ६८ व्या वर्षी हाॅस्पिटल मध्ये १९८७ साली त्यांचा मृत्यु झाला तेव्हा एखाद्या बेवारश्यासारखे त्यांचे पार्थिव परस्पर स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी नेले. जयदेव हे शापित यक्ष होते. जयदेवजीं सारखा संगीतकार परत होणार नाही.

हिंदी चित्रपट संगीतावर आधारित इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment