धनंजय कुलकर्णी 

कुंदनलाल तथा के एल सहगल भारतीय सिनेमासंगीतातील ध्रुव तारा होते. आज १८ जानेवारी. सहगल यांचा स्मृती दिन. त्यांची कारकिर्द केवळ १०-१२ वर्षाची; पण या छोट्याश्या कालखंडात ध्वनीमुद्रणाचे तंत्र पुरेसे विकसित झाले नसताना त्यांनी आपल्या स्वराने रसिकांना झुलविले. सैगलच्या स्वराचा व गाण्यांचा हॅंगओव्हर पुढच्या दोन पिढ्यांवर कायम होता. त्यांची गाणी ऐकताना एक दमदार / उबदार/ आश्वासक स्वर आपल्या गाणी पडतोय अशी रसिकांची भावना असे. त्यांच्या एका गाण्याचा किस्सा तसा बराच लोकप्रिय असला तरी नवीन पिढीच्या वाचकांकरीता तो सांगणं आवश्यक ठरावे.

संगीतकार नौशाद अली यांनी आपल्या आत्मचरीत्रात याचा उल्लेख केला आहे. त्यांची आणि सैगल ची पहीली भेट १९४५ साली कारदार स्टुडिऒत झाली. पूर्ण टक्कल, डॊळ्यावर जाड भिंगाचा चष्मा यामुळे त्यांनी सैगलला ओळखलंच नाही. त्या काळात सैगल पूर्णपणे मद्याच्या आहारी गेले होते. मद्य घेतल्या शिवाय ते गातच नव्हते. सैगलचा आवाज आपल्या सिनेमात पाहिजे या स्वार्थी विचारापोटी कुणीही त्यांना या व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न तर सोडा उद्युक्तच करत होते. नौशाद यांना सैगल कडून ’शहाजहॉं’ (१९४६) करीता गाणी गावून घ्यायची होती. गाण्याच्या रिहर्सलच्या वेळी ते टेकच्या आधी ते आपल्या ड्रायव्हरला बोलावून ’काली पांच लावो’ असं सांगायचे. ड्रायव्हर गाडीतून व्हीस्की घेवून यायचा एका ग्लासात भरून द्यायचा. मद्य घेतल्यावर सैगल गायचे. दारू घेतल्याशिवाय मला गाता येणारच नाही असा त्यांचा ग्रह झाला होता. नौशाद यांनी त्यांचा हा समज खोटा आहे हे सिध्द करायचे ठरवले. पण सैगल त्या वेळी टॉपचा गायक होता तर नौशाद यांचा तो उमेदवारीचा काळ होता. दारू न घेता मी गाऊच शकणार नाही असं सैगल सांगू लागले .

Singer and Actor K.L. Saigal
Singer and Actor K. L. Saigal

नौशादनी एक प्रयोग करावयाचा असे ठरवले. ’जब दिल हि टूट गया हम जी के क्या करेंगे’ या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी ते सैगल ला म्हणाले आपण एक टेक ’काली पांच’ घेवून करूत व एक टेक न घेता करूत. नंतर दोन्ही टेक पैकी कोणता ठेवायचा ते तुम्ही ठरवा. हो नाही करत सैगल ने दोन्ही टेक केले. दुसर्‍या दिवशी सैगलला दोन्ही टेक ऐकवले. दारू न घेता गायलेला टेक सरस होता व तोच कायम झाला. सैगलच्या डोळ्यात पाणी आलं. ते नौशाद यांना म्हणाले ’ काश आप मुझे इससे पहले मिलते…अब तो बहुत देर हो चुकी है’ सैगल मद्य न घेता गाऊ शकतो हि त्या काळातली मोठी ब्रेकींग न्यूज ठरली. पण तो वर खूप उशिर झाला होता. अति मद्य सेवनाने तो आतून पोखरला होता. आपल्याला मृत्यु आपल्या गावी यावा म्हणून तो जालंदरला गेला व तिथेच अखेरचा श्वास घेतला. मद्याने एका गुणी गायकाला अकाली वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्युच्या समीप नेले. १८ जानेवारी १९४७ रोजी या गंधर्वाचा अंत झाला.

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment