९० च्या दशकात म्युझिकल हिट्स देणारे दिग्दर्शक ‘राज कंवर’

९० च्या दशकात सिनेमाचा दर्जा आणि त्याचे व्यावसायिक यशाचे गणित याची योग्य सांगड घालण्यात जे दिग्दर्शक यशस्वी ठरले त्यात आघाडीचे नाव होते ‘राज कंवर’ यांचे. वयाच्या पन्नाशीत असताना राज कंवर यांचे २०१२ साली अकाली निधन झाले. १९९२ ते २००३ हा अकरा वर्षांचा कालखंड राजजींनी गाजवला. आज त्यांचा जन्मदिन.
राजजींची सुरुवात रंगभूमीपासून झाली. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी दिल्लीत हिंदी नाटकांचे दिग्दर्शन केले. दिल्लीहून मुंबईत आल्यावर सुरुवातीची काही वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. राजकुमार संतोषी (घायल) व सुनील हिंगोरानी (राम अवतार) व शेखर कपूर (मि. इंडिया) या दिग्दर्शकांना असिस्ट केल्यांनतर राजजींनी १९९२ साली दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले. चित्रपट होता ‘दिवाना’. शाहरुख खान, दिव्या भारती व ऋषी कपूर यांच्या प्रेमाचा त्रिकोण दिवाना सुपर डुपर हिट झाला व पहिल्याच चित्रपटाने राज यांची दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली.
काही अपवाद वगळता दिवाना नंतर आलेल्या बऱ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अगदी दणदणीत यश मिळाले. त्यात प्रामुख्याने लाडला, जान, जीत, जुदाई, इतिहास, दाग-दि फायर, बादल, हर दिल जो प्यार करेगा, अब के बरस, अंदाज या यशस्वी नावांचा समावेश आहे. कर्तव्य, ढाई अक्षर प्रेम के, फर्ज, हमको दिवाना कर गये ही काही न चाललेली नावे.
राजजींच्या प्रत्येक चित्रपटाचे संगीत मात्र हमखास हिट असायचे. चित्रपट हीट ठरो कि फ्लॉप, गाणी मात्र हमखास श्रवणीय असायची. राजजींना संगीताची जाण होती व त्यावर ते स्वतः जातीने लक्ष द्यायचे. २०१० साली आलेला सदियाँ हा राजजींचा शेवटचा चित्रपट ठरला. म्युझिकल हीट मसाला चित्रपटाचा फार्मुला सापडलेल्या राजजींनीं मात्र कधीही चित्रपटाच्या यशासाठी अश्लीलतेचा आधार घेतला नाही.
यामुळेच राजजींचे नाव सिनेसृष्टीत आदराने घेतले जाते. राजजी स्वतः निर्माता व लेखकही होते.
– टीम नवरंग रुपेरी
Website | + posts

Leave a comment